

टाकळी हाजी: शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र व वॉटर पार्कमध्ये गंभीर अपघात झाला. त्यात एका महिलेचा मणका तुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे पर्यटकांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे. याप्रकरणी मालक व व्यवस्थापकांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किरण मल्हारी नप्ते (वय 37, रा. चिंचवड; मूळ रा. करंदी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली, तर या घटनेत त्यांच्या चुलत भावजय अश्विनी संदीप नप्ते (वय 37) यांना गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना 21 मार्च 2026 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. त्या वेळी या फिर्यादी आणि त्यांच्या चुलत भावजय अश्विनी नप्ते वॉटर पार्कमधील घसरगुंडीवरून खाली पाण्यात पडल्या. त्या वेळी तेथे कोणतीही पुरेशी सुरक्षाव्यवस्था, मार्गदर्शन किंवा खबरदारीचे उपाय नव्हते. त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे.
या दुर्घटनेत अश्विनी नप्ते यांच्या मणक्याला जबर मार बसून चार मणके तुटले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. एका निष्काळजी व्यवस्थापनामुळे एका कुटुंबावर संकट कोसळल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोल षस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तपास करीत आहेत.