

बारामती: शिक्षण, उद्योग आणि प्रगतीचे मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातही तरुणाई व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. समाजासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.
एकीकडे उच्च शिक्षण, आधुनिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढत असताना दुसरीकडे काही तरुण चुकीच्या मार्गाला लागून नशेच्या आहारी जात आहेत. वाढती स्पर्धा, बदलती जीवनशैली, चुकीची संगत आणि सहज उपलब्ध होणारे अमली पदार्थ, यामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.
Baramati Political Banner Controversy: ‘...घातकी तटकरे-पटेलची गरज नाही’; वादग्रस्त फलकामुळे बारामतीत वातावरण तापलेयाचबरोबर वर्चस्ववाद, भाईगिरीची प्रवृत्ती आणि सोशल मीडियाचा चुकीचा प्रभाव, यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. याचा परिणाम थेट कुटुंबव्यवस्थेवर होत असून, एका तरुणाच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडते. पालकांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात, समाजात बदनामी होते आणि सुरक्षिततेची भावना कमी होते.
बारामतीसारख्या प्रगत तालुक्यात ही समस्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. तरुणांशी असलेला संवादाचा अभाव, मार्गदर्शनाची कमतरता आणि वाढते एकटेपण, ही प्रमुख कारणे आहेत.
अनेक पालक मुलांच्या गरजा पूर्ण करण्यात व्यस्त राहतात; मात्र त्यांच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष होते. महाविद्यालयीन वयातच मुलांच्या हातात मोबाईल, दुचाकी आणि पैसा येत असला, तरी त्याचा योग्य वापर कसा करावा, याचे भान कमी आहे. पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्यांच्या वर्तनातील बदल ओळखावा. मित्रपरिवारावर लक्ष ठेवणे, अचानक वाढलेला खर्च आणि बदललेल्या सवयी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
समाजाने पुढाकार घेण्याची गरज
केवळ पोलिस कारवाई करून ही समस्या थांबणार नाही. स्थानिक पातळीवर समाजसेवक, शिक्षक, राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती आणि समुपदेशन कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
सण-उत्सव, यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तरुणांना स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घेतल्यास फायदा होणार आहे. बारामतीसारख्या प्रगत तालुक्याची ओळख टिकवायची असेल, तर तरुणाईला योग्य दिशा देणे अत्यावश्यक आहे. व्यसन आणि गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी पालक, समाज आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.