चोर्‍या रोखण्यात शिरूर पोलिस अयशस्वी

चोर्‍या रोखण्यात शिरूर पोलिस अयशस्वी

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चोर्‍या थांबण्याचे नाव घेत नाहीत. या आठवड्यात चोरट्यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच लावलेल्या शववाहिनी (स्वर्ग रथ)च्या बॅटरीवर डल्ला मारला आहे. कवठे येमाई हद्दीतील घोड नदीवरील प्रताप जाधव यांचा पाच एचपीचा कृषी पंप तसेच वडनेर खुर्द येथून सोमवारी (दि. 6) रात्री एकाच वेळी दहा शेतकर्‍यांच्या मोटारी, केबल आणि पॅनल बॉक्स चोरीला गेले आहेत. चोरीचे एकामागून एक प्रकार घडत असल्याने या परिसरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

यापूर्वी या वर्षभरात विद्युत पंप, केबल, ठिबक संच, कृषिकेंद्र, घरफोडी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. घरफोडीमध्ये शासकीय सेवेतील दोन निवृत्त वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घरफोडीचाही समावेश आहे. चार महिने उलटूनही या सार्‍या घटनांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांना वेळोवेळी बंदोबस्तासाठी बाहेर जावे लागते. यामुळे वारंवार होणार्‍या चोर्‍यांचा तपास करण्यास हवा तेवढा वेळ पोलिसांना मिळत नाही, असेही कारण पोलिसांकडून पुढे येत आहे. कधी तक्रार देण्यासाठी तक्रारदारांना टाकळी हाजी दूरक्षेत्र येथे कर्मचारी नसल्याने शिरूरला जावे लागते. अनेक चोरीच्या घटना घडूनही तपास न लागल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news