

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील मबेटफ भागात थंडीचा प्रभाव कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका रब्बी हंगामातील कांदा पिकांना बसत असून, वातावरणातील बदलामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी सध्या औषध फवारणीत गुंतले आहेत.
काठापूर, जांबूत, पिंपरखेड, वडनेर खुर्द, चांडोह, फाकटे, टाकळी हाजी, कवठे येमाई व सविंदणे या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने विशेषतः उशिरा लागवड केलेल्या (मागास) कांदा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटत असून, रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पाणी व खतांचे योग्य व्यवस्थापन करत आहेत. तसेच कीड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची पाण्याची गरजही वाढली आहे. अशा परिस्थितीत उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे व बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडले असल्याचे चित्र बेट भागात पाहायला मिळत आहे.