पुणे : अन् अधिकार्‍यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास !

पुणे : अन् अधिकार्‍यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास !
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे प्रस्तावित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम ऐनवेळी चार वेळा स्थगित करण्यात आला. तर, पाचव्यांदा कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार सोमवारी एकदाचा कार्यक्रम पार पडला आणि अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम आणला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम पहिल्यांदा 3 जुलै रोजी निश्चित करण्यात आला. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी, 3 जुलैऐवजी 8 जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारामुळे ऐनवेळी ही तारीखही रद्द करीत 13 जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौर्‍यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर 23 जुलै ही नवी तारीख देण्यात आली.

मात्र, मुसळधार पावसाचे कारण सांगत ही तारीखही रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकवेळी कार्यक्रमाची तयारी करूनही ऐनवेळी कार्यक्रम स्थगित होत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी निरुत्साही झाले होते. मात्र, सोमवारी एकदाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उत्साह मावळत गेला

राज्यात विविध ठिकाणी 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात
येत आहे. त्यामुळे सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले. त्या वेळी अधिकार्‍यांनी रात्र-दिवस काम करून तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम स्थगित झाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांचा उत्साह मावळत गेला.

कार्यालयात सापडेना 'झेडपी'चे अधिकारी

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी जेजुरी येथे सोमवारी झालेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी गेल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या तसेच इतर योजनांच्या लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी घेऊन येणे, त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या-त्या विभागांवर होती. त्यासाठी अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेतील इतर कर्मचार्‍यांना जेजुरी येथील कार्यक्रमस्थळी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बहुंताश कर्मचारी हे कार्यक्रमस्थळी असल्याने जि. प.च्या कार्यालयातील सर्व विभाग रिकामे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news