दिवे : पुढारी वृत्तसेवा : दिवे परिसरात ओढ्यातील पाणीसाठा काही प्रमाणात टिकून आहे. मात्र, डोंगरालगत असणार्या अंजीर उत्पादकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिके वाचवण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दिवे भागात अंजीर लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अंजिराचा खट्टा हंगाम संपून मिठ्ठा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नेमके याचवेळी पाण्याची कमतरता जाणवत आहे. ज्वारीच्या पेरणीत कमालीची घट झाली आहे. परिणामी, कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने दुग्ध व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत.
विहिरी, शेततळ्यांनी तळ गाठल्याने पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पिकांना पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. डोंगर भागात ससा, हरीण, रानडुक्कर, कोल्हे आदी प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी हे प्राणी मानवीवस्तीकडे धाव घेत आहेत. मागच्याच आठवड्यात पोपट झेंडे यांच्या शेतात दिवसा रानडुक्करांचे दर्शन झाले होते.
पाणीटंचाई दूर होण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या भागात सोडावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे. दिवे परिसरात पाच व सहा अशा शेवटच्या टप्प्यात योजनेचे पाणी येते. मात्र, त्या वेळी अज्ञातांकडून व्हॉल्व खोलले जातात व पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही, अशी शेतकर्यांची तक्रार आहे. आम्ही अगोदर पैसे भरण्यास तयार असून, आम्हाला पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडावे, अशी आर्त भावना शेतकर्यांनी दैनिक 'पुढारी'कडे व्यक्त केली.
राज्य सरकारने आश्वासन पाळावे
नवीन सरकारने पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकर्यांना 19 टक्के दराने मिळेल, अशी घोषणा केली होती. त्याची त्वरित अंमलबजावणी करून पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, अशी मागणी दिवे येथील शेतकरी किरण टिळेकर व सुधीर झेंडे यांनी केली.