

पुणे: मैदानावरील धूळ आणि घामाच्या धारांतून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या हजारो खेळाडूंच्या स्वप्नांना आता हक्काच्या ‘गुणां’चे बळ मिळण्याची प्रतीक्षा आहे. यासाठी आता थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाच शालेय खेळ-क्रीडा संस्थेने साकडे घातले आहे. तब्बल चार लाख खेळाडू आणि सात हजार प्रशिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
गेली दहा-बारा वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या 44 क्रीडाप्रकारांना शालेय परीक्षेत क्रीडा गुण सवलत मिळावी, या मागणीसाठी शालेय खेळ-क्रीडा संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. मैदानात कसब दाखविणाऱ्या या खेळाडूंचे शैक्षणिक नुकसान टळावे आणि त्यांच्या कष्टाला गुणांचे कोंदण मिळावे, ही आर्त साद या निवेदनातून घालण्यात आली आहे.
यासंदर्भात शालेय खेळ-क्रीडा संस्थेने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळामध्ये राज्य अध्यक्ष श्याम भोसले, उपाध्यक्ष महावीर धुळधर, रवींद्र चोथवे, क्रीडा संघटक मीनाक्षी गिरी, रॉकी डिसुजा, अशोक फरगडे, अशोक कदम यांसह विविध खेळांतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तब्बल चार लाख खेळाडू आणि सात हजार प्रशिक्षक कोणतीही शासकीय मदत न घेता गेली अनेक वर्षे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळांची मशाल पेटवत आहेत. मात्र, केवळ 49 खेळांनाच गुण सवलत मिळत असल्याने उर्वरित खेळाडूंमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने या मागणीची दखल घेत सकारात्मक पाऊल उचलले असून, क्रीडा गुण देण्याबाबत शिफारसही केल्याचे शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या खेळांना गुण सवलत मिळाल्यास ग््राामीण व आदिवासी भागातील प्रतिभेला वाव मिळेल आणि ‘खेलो इंडिया’सारख्या मोहिमांना खऱ्या अर्थाने बळ प्राप्त होणार आहे. क्रीडा विभागानेही क्रीडा गुण देण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
- श्याम भोसले, राज्य अध्यक्ष, शालेय खेळ-क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य