

सासवड: सासवड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या तीव पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि. 11) सासवड नगरपरिषदेवर ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ काढण्यात आला. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध भागांतील रहिवासी मोर्चात सहभागी झाले होते.
सासवड शहरातील सध्याची पाणीपुरवठा योजना तब्बल 27 वर्षांपूर्वीची असून, वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता ती पूर्णपणे अपुरी ठरत असल्याची तीव भावना नागरिकांनी व्यक्त केली. गळती, तांत्रिक बिघाड आणि विस्कळीत नियोजनामुळे अनेक भागांत पाच-पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरपरिषदेकडून ‘दिवसाआड पाणी’चे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात उन्हाळ्यात संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्याचे चित्र असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख मिलिंद इनामके यांनी सांगितले.
पाण्यासाठी तासन्तास रांगा लावाव्या लागतात. अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाविरोधात नगरसेवक प्रीतम म्हेत्रे यांनी तीव नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 2024 मध्ये मंजूर झालेल्या 143 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन निधी उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय श्रेयवादामुळे काम रखडल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते मंदार गिरमे आणि नगरसेवक बाळासाहेब भिंताडे यांनी केला. या आंदोलनात राजेंद्र टकले, सचिन भोंडे, नगरसेविका दीपालीताई जगताप, शिल्पाताई जगताप, रत्नाकाकी म्हेत्रे, हेमलता इनामके, माधुरी राऊत, माजी नगरसेवक दीपक टकले, मंगल म्हेत्रे, मयूर जगताप, अक्षयराज जगताप, संदीप जगताप, मंगेश भिंताडे, श्रीकांत टिळेकर, रोहित ताम्हाणे, राजू शिंदे, धनंजय म्हेत्रे आदींसह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.