

अमृत भांडवलकर
सासवड : नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या दिवशी झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतच मुख्य लढत निश्चित झाली आहे. भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत पक्ष पदाधिकाऱ्यांतून व्यक्त केले जात आहे.
सासवड नगरपरिषद काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो परंतु, आता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार संजय जगताप या नगरपालिकेवर कमळ फुलवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जगताप यांनी शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवत अखेर त्यांच्या मातोश्री दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून कामकाजाचा अनुभव असलेल्या आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनाच उमेदवारी निश्चित करण्यात आली. शिवेसना (एकनाथ शिंदे) गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन सुरेशराव भोंगळे, महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी चुरस पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदासाठी एकूण 15 तर नगरसेवकपदासाठी 128 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी राखीव असून, 11 प्रभागांतून 22 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
1998 पासून 2023 पर्यंत काँग्रेस प्रणित शहर जनमत विकास आघाडीचे वर्चस्व सासवड परिषदेवर राहिले असून, माजी नगराध्यक्ष व माजी विधान परिषद सदस्य दिवंगत चंदुकाका जगताप आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र माजी आमदार संजय जगताप यांचे वर्चस्व होते. 2024 विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने यंदाची निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशीच राहील यात शंका नाही. भाजपच्या विरोधात इथे महाविकास आघाडीची ताकदही निर्णायक ठरणार आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली असली, तरी शिवसेनेने दोन जागा निवडून आणल्या व नगराध्यक्षपद केवळ 75 मतांच्या फरकाने गमावले होते.
सासवड शहरात वेगवेगळ्या कारणांनी नागरिक वास्तव्यास येण्याचे प्रमाण मोठे आहे. काम, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदींसाठी सासवड शहरात राहण्यास पसंती दिली जात आहे. शहरात नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक, 18 वर्षे पूर्ण झालेले युवक व युवती, विद्यार्थी, परप्रांतीय कामगार व मजूर, कुटुंबातील सदस्य वाढल्याने ते शहरात इतरत्र स्थायिक होत आहेत, आदी विविध कारणांमुळे मतदार संख्याही वाढत आहे. यामुळे हे मतदार कोणाच्या पाठीशी राहतात त्यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.