![जंक्शन : संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग होणार एक नंबर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2FeSakal___2021_06_09T162212_708.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जंक्शन; पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा देशात एक नंबरचा महामार्ग होणार असून, वारकर्यांसाठी रस्त्यालगत झाडे व फुटपाथ बनविण्यात येणार आहे. इंदापूर तालुक्यातून तीन महामार्ग जाणार असल्याने तालुक्याचा चौफेर विकास होणार असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. जंक्शन (ता. इंदापूर) येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सत्कारावेळी बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पालखी महामार्ग प्रकल्पाची माहिती करून घेतली.
रस्त्याबाबतच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या वेळी बारामती लोकसभा प्रभारी राम शिंदे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, गणेश भेगडे, वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात आदी उपस्थित होते.
या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थमंत्री आले आहेत. पालखी महामार्गात जंक्शन चौक येथे वालचंदनगर इंडस्ट्रीच्या जॉबबाबत, लासुर्णे येथील मिनी उड्डाणपुलाबाबत व शेळगाव येथे अडचणी आहेत. या परिसरात सहकारी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात असल्याने संबंधित गावातील अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याची मागणी पाटील यांनी केली.