

बारामती; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीत जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले व हातावरील जंतू निष्क्रिय करण्यासाठी कायम जवळ बाळगले जाणारे आणि प्रत्येक ठिकाणी गेले की, पहिले हातावर दिले जाणारे सॅनिटायझर आता दुकानात अथवा सार्वजनिक ठिकाणी शोभेची वस्तू म्हणून दिसू लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाकाळात साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन करून मोठा नफा कमावला.
पूर्वी फक्त मोठ्या रुग्णालयात आणि खासगी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे सॅनिटायझर कोरोना काळात प्रत्येकाची गरज बनली होती; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सॅनिटायझरचे महत्त्व कमी झाले असून, आता घराघरांतून उपलब्ध असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कोरोना राज्यात दाखल झाल्यानंतर हळूहळू रुग्णालये, सरकारी कार्यालयांतून त्याने देशातील ग्रामीण भागही कवेत घेतला. यानंतर सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणा-या सॅनिटायझरची मागणी वाढली.
अनेकांनी यातून पैसे कमावले. लस आल्यानंतर आणि तिचे दोन्हीही डोस घेतल्यानंतर सॅनिटायझरचे महत्त्व कमी झाले आहे. कोरोना महामारीपूर्वी वैद्यकीय क्षेत्र वगळता सामान्यांना सॅनिटायझरबाबत फारशी माहिती नव्हती. महामारी सुरू झाली आणि आरोग्य विभाग व सॅनिटायझर चर्चेत आले. कोरोनाचा सामान्यतः हातावरील किंवा वस्तूंवरील वाढता प्रसार रोखण्यासाठी याची आवश्यकता वाढली होती. यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांनी चढ्या दराने सॅनिटायझर विकून धंदा करून घेतल्याची शेकडो उदाहरणे पाहायला मिळाली.