बारामती : कमी पटाच्या शाळा बंदचा निर्णय रद्द करा; शिक्षक संघाची मागणी

बारामती : कमी पटाच्या शाळा बंदचा निर्णय रद्द करा; शिक्षक संघाची मागणी

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या ग्रामीण भागातील वाडी-वस्ती, तांडा, साखरशाळा, खडी केंद्र, तसेच दुर्गम भागातील 0 ते 20 पटापर्यंतच्या शाळा बंद करण्याबाबतचे शासन परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव, सरचिटणीस लायक पटेल, कार्याध्यक्ष लोमेश वर्‍हाडे, कोषाध्यक्ष संभाजी बापट यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 21 सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामीण भागातील 0 ते 20 पटाच्या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कुठपर्यंत आली असा आढावा घेणारे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी माहिती घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5 टक्के खर्च होतो, तो वाढवण्याची आवश्यकता आहे. राज्यात शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरावीत, असा अहवाल शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासनास सादर केला आहे. त्याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी रिक्त पदे भरल्यास राज्य सरकारवर आर्थिक भार पडेल हे कारण पुढे करून नवीन भरती करण्याऐवजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी आहे. या निर्णयाविरोधात पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे संघाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news