वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीच्या कामगारांना कंपनीचे मालक चकोर दोशी व व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी यांनी मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचा शब्द दिला आणि लागलीच कामगार संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. या संपावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय नेत्यांनी मोठे प्रयत्न केले होते. या सर्वांच्या विनंतीचा मान राखून संप मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व सचिव शहाजी दबडे यांनी जाहीर केले.
वालचंदनगर कंपनीच्या कामगारांनी थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी दि. 22 नोंव्हेबर 2023पासून संप पुकारला होता. संपाच्या 42व्या दिवशी मंगळवार, दि. 2 जानेवारी रोजी मंत्रालयामध्ये कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी व कामगार संघटनेची समन्वय बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे मालक चकोर दोशी व व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी यांनी कामगार संघटनेशी सकारात्मक चर्चा करून कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवार, दि. 4 जानेवारीपासून कामगार कामावर जाणार आहेत.
हा संप मिटविण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याने संघटनेने आभार मानले. तसेच पियाजो कंपनीतील तुकाराम चौधर, जंक्शनचे सागर मिसाळ यांनी शरद पवार, खासदार सुळे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे कामगारांनी सांगितले.
राजकीय नेत्यांनी केले विशेष प्रयत्न
वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा संप मिटविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी कंपनीचे मालक चकोर दोशी, व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी तसेच कामगार युनियनचे प्रतिनिधी यांची बैठक घेत समेट करण्याचा प्रयत्न केला. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरमिशनच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये कामगारांचा प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच कामगारमंत्र्यांनी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने बैठक बोलावली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या बैठकीत पुढाकार घेत तोडगा काढण्याची भूमिका बजावली.