पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड येथील चिंतामणी रात्र प्रशालेतील रेश्मा उबाळे हिने परिस्थितीवर मात करीत, कठोर परिश्रम करून बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. रेश्मा हिने 67.17 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला आहे. घरच्या परिस्थितीमुळे रेश्मा हिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यामध्ये लवकर लग्न झाल्यामुळे शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिली. रेश्माला दहावीनंतर नर्सिंग करायचे होते. ज्या वेळी ती प्रवेश घ्यायला गेली तेव्हा तिचे शिक्षण कमी असल्याने तू नर्सिंग करू शकत नाही असे सांगितले. रेश्माला सध्या एक सात वर्षाचा मुलगा आहे.
लग्न करून पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर मुलगा लहान असताना तिने पुन्हा शिकण्याचा निश्चिय केला. अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला तिच्या पतीने प्रोत्साहन दिले. यानंतर तिने रात्रशाळेस प्रवेश घेतला. एकत्र कुटुंबपदध्तीमध्ये राहत असलेल्या रेश्माने घरची व मुलाची जबाबदारी सांभाळत इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला. येथून पुढे तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली.
सध्या मुलांचे शिक्षण त्याला शाळेत सोडविणे व आणणे. घरचे काम आणि स्वत:चा अभ्यास करून तिने हे यश संपादन केले आहे. दहा ते बारा वर्षानंतर पुन्हा शिक्षणाचा विचार कोणी सहसा करणार नाही. पण रेश्माने हे आव्हान पेलले. हार न मानता अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळविले.