नायगाव; पुढारी वृत्तसेवा : वाघापूर (ता. पुरंदर) येथील गायरान जागेत स्थानिक नागरिकांच्या अनेक पिढ्यांनी वास्तव्य केले आहे. पट्ट्यादेखील नियमित भरल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण निष्कमितच्या नोटिसा आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून अतिक्रमण नियमित करण्याची मागणी केली आहे. वाघापूर येथे शनिवारी (दि.3) सायंकाळी ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणाबाबत मिळालेल्या नोटिशीला प्रतिउत्तर व ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक झाली, या वेळी ग्रामस्थांनी गार्हाणे मांडले.
गायरानातील जागेवर अनेक कुटुंबांच्या पिढ्यांनी वास्तव्य केले आहे. जवळपास सर्वच ग्रामस्थांनी पक्क्या स्वरूपाची घरे बांधली आहेत. गावचा नागरिक म्हणून घरांपर्यंत दिलेल्या पाणी, वीज अशा सुविधांच्या पट्ट्याही नियमित भरल्या आहेत, असे अनेकांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. अशा ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने घरांचे अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईची नोटीस मला जुनी तारीख टाकून दिली आहे. मध्यंतरी आम्ही बाहेरगावी गेलो असता आम्हाला ग्रामपंचायत कर्मचार्याने संपर्क न करता नोटीस शेजारी राहणार्या नागरिकांकडे दिली, असे एका नागरिकाने म्हटले आहे.
वर्षानुवर्षे गायरानात ग्रामस्थ वास्तव्य करत आहेत. मेहनत, उसनवारी व कर्ज काढून अनेकांनी पक्की घरे उभी केली आहेत. अशांना अतिक्रमण काढणे शक्य नाही. यामुळे सर्वांना बेघर व्हावे लागेल. वेळ प्रसंगी ग्रामस्थांसाठी न्यायालयात जाऊ.
– अॅड. नितीन कुंजीर, ग्रामस्थ.