

पुणे: ठाणे जिल्ह्यातील मुंब्राजवळ लोकल रेल्वेच्याभीषण अपघातानंतर रेल्वेमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रेल्वेमंत्र्यांकडे राजीनामा मागण्यापेक्षा रेल्वेमंत्र्यांनी येथे येऊन स्थितीची पाहणी करावी, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. सोमवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी, रेल्वे प्रशासनाचे वास्तवच मांडले.
मुंब्रातील धोकादायक वळणावर दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्याने 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यामध्ये, चार जणांना आपला जीव गमावावा लागला असून नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Pune News)
या घटनेवर ठाकरे म्हणाले, मुंबईत झालेला रेल्वे अपघात व त्यात झालेला प्रवाशांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. पण, मुंबईत या घटना रोज घटतात तसेच रोज प्रवासी जखमी होतात. मात्र, त्याचे कोणालाही काही देणे घेणे नाही. सद्य:स्थितीत राज्यातील सर्वच शहरांचे नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे.
शहरांमध्ये प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे. पण पार्किंगचे काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणार्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले. यावेळी ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळाची मागणी केली.
देशात माणसाच्या जिवाला किंमत नाही
मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात. तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जिवाला किंमतच नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.