पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या बहुतांश भागांतून मुसळधार पाऊस पूर्ण कमी झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने तापमानात ८ ते १० अंशांनी वाढ झाली आहे. मोठ्या पावसाने ८ ते ९ ऑगस्टपासून विश्रांती घेतली असून आता तो थेट १० ते १२ दिवसांनी बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील मोठ्या पावसाने विश्रांती घेतली असून, सध्या कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान २१ ते २२ अंशांवरून थेट ३० ते ३१ अंशांवर गेले आहे. आता विदर्भातच पावसाचा अंदाज आहे. त्या भागातही १५ ऑगस्टपासून वाढण्याचा अंदाज आहे.
उर्वरित राज्यात मात्र ऑगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पुन्हा पावसाला प्रारंभ होईल, असा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये तुलनेत कमी पाऊस भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्टमध्ये ९४ ते १०० टक्के पाऊस बरसणार आहे.
संपूर्ण देश : ६
महाराष्ट्र : २९
कोकण : ३३
मध्य महाराष्ट्र : ३९
मराठवाडा : १४
विदर्भ : २६
मुंबई : २४
पुणे : ५८
नागपूर : १५
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात खूप चांगला पाऊस झाला. सरासरी ५३ टक्के पाऊस पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतर ९ ते १० ऑगस्टपासून राज्यातील मोठा पाऊस कमी होण्यास सुरुवात झाली. १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातून मोठा पाऊस पूर्ण ओसरला आहे.
फक्त विदर्भात तो १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत पडेल. मात्र हा अलर्ट मध्यम पावसाचा आहे. राज्यात १८ ऑगस्टपर्यंत सर्वत्र रिमझिम पावसाचा अंदाज असून, १९ पासून पाऊस वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
केरळ ते गुजरात या भागात कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता. त्यामुळे अतिवृष्टी ते मुसळधार, असा पाऊस झाला. हा पट्टा ८ ऑगस्टपर्यंत सक्रिय असल्याने पहिल्या आठवड्यातही चांगला पाऊस झाला. मात्र, सध्या राज्यात कमी दाबाचे पट्टे विरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असून, कमाल तापमानात एकदम ८ ते १० अंशांनी वाढ झाल्याने वातावरणातला गारवा कमी होऊन किंचित उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे.