

पुणे : आपल्या देशातील महिला अजूनही पुरुषांच्या बंदीवासात असून ८० टक्के महिलांची दररोज मानसिक, आर्थिक आणि शारीरिक पद्धतीने कुचंबणा होत आहे. दररोज २८ टक्के महिलांची छेडछाड होते, तर ६ टक्के महिलांवर रोज बलात्कार होतो. मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की, महिला ही पुरुषाची बंदिनी असून तिच्यावर त्यांचा मालकी हक्क आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे मत कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमात १८ हजार तरुणींशी बोलताना व्यक्त केले.
पुण्यात शनिवारी नगररोडवरील एका खासगी महाविद्यालयाच्या प्रांगणात या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच पासून या कार्यक्रमासाठी देशभरातून मुलींची गर्दी झाली. त्यांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ७.२० ला राहून गांधी यांचे आगमन झाले. तोच तरुणींनी मोबाइलचे टॉर्च ऑन करून राहुल....राहुलचा गजर केला. राहुल यांनी थेट तरुणींशी संवाद साधायला सुरुवात केली.
राहुल म्हणाले, मी तुमच्याशी संवाद साधण्यापेक्षा तुमची मानसिकता आणि जीवन कसे चालले आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे. पडद्यावर मनुस्मृतीचा कोट दाखवत ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की, महिलेवर नेहमीच पुरुषांचा अधिकार राहील. तो तिचा मालक आहे. तिला कोणतेही स्वातंत्र्य नाही. त्यानंतर पडद्यावर पुन्हा देशातील महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी त्यांनी सादर केली. ते म्हणाले की, ६० टक्के महिला अजूनही असुरक्षिततेच्या भावनेने घराबाहेर पडू शकत नाही. ४५ टक्के महिलांना लग्नाचा विचार सोडून द्यावा लागतो. तसेच फक्त ८ टक्के महिलांच्या नावावर संपत्ती आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेल्या महाविद्यालयीन तरुणींशी संवाद साधला. घरात तुमचे अधिकार कसे हिरावून घेतले जातात? या बद्दल प्रश्न त्यांना विचारले. मुलींनी देखील धीटपणे सांगितले की, आम्हाला घरात अजूनही भावापेक्षा दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. तसेच समाजात वेळोवेळी झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली.
पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका
संवादाच्या शेवटी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे व्हिडिओ दाखवले. त्यांच्याकडे पाहून ते हसत म्हणाले की, पहा आपले पंतप्रधान महिला आणि मुलींबद्दल काय आणि कसे बोलतात. तुम्हाला दिल्लीत शिवीगाळ झाली, धक्काबुक्की झाली, अवहेलना झाली तरीही हे म्हणतात तुमच्या शिव्यांनी मी दुखावलो. सरसंघचालक मोहन भागवतही संस्कारांची भाषा बोलतात आणि सरकारची पाठराखण करतात. अशी टीकाही गांधी यांनी केली.