

राहू : रोहित्राच्या उभारणीसाठी लागणारा सांगाडा करून सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी कृषी धोरणांतर्गत रोहित्र न बसविल्याने वाळकीतील (ता. दौंड) शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. महावितरणच्या बारामती व केडगाव विभागातील अधिकारी व ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे नुकसान होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
जानेवारी ते मार्च या काळात वीजबिल भरण्यासाठी महावितरणने मोठ्या प्रमाणात कृषी पंपांचा पुरवठा खंडित केला होता. शेतकर्यांनी वीजबिल भरल्यानंतर तेहतीस टक्के रक्कम त्याच विभागात खर्च करण्यात येत आहे. त्यानुसार रोहित्र उभारण्यात येत आहे. मात्र, वाळकीत गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणची यंत्रणा काम करत नसल्याचे चित्र आहे. रोहित्राच्या उभारणीसाठी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांनी अनेकदा महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. परंतु तरीही रोहित्र बसविण्यात आलेले नाही. याबाबत केडगाव विभागीय महावितरणचे कार्यकारी अभियंता सदानंद एडके यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी सातत्याने सांगूनही ठेकेदार ऐकत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल थोरात यांनी केली आहे. रोहित्राचे काम लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
महावितरणकडे कृषिपंपासाठी कोटेशन भरल्यानंतर आम्हाला वीजबिले आली आहेत. परंतु, महावितरणकडून रोहित्र बसविण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचे शेतकरी दिगंबर थोरात यांनी सांगितले. दरम्यान, रोहित्र बसविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचे सहाय्यक अभियंता पप्पू पिसाळ यांनी सांगितले.