

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 15 जूनपर्यंत शंभर टक्के भूसंपादन करण्याचे लक्ष्य जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. मोबदल्याच्या सूत्राला अंतिम स्वरूप दिल्यानंतर संमतिपत्रे मिळविण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया वेगाने होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत मोबदला आणि पुनर्वसनाबाबत माहिती दिली जात आहे. मोबदल्याचे सूत्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत बरीच संमतिपत्रे जमा झाली असून, रखडलेली प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, काही गावांमधील शेतकरी आणि ग््राामस्थांकडून अजूनही विरोध कायम आहे. जमिनींचे मूल्यांकन, पुनर्वसनाची हमी आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने केवळ आर्थिक मोबदला न देता दीर्घकालीन विकासाचा आराखडा स्पष्ट करावा, अशी मागणीही काही संघटनांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला आहे. उर्वरित अडचणी संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.