

पुणे: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटले असले तरी अध्यक्षपदाबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. अनेक तालुक्यांतील नेत्यांनी किमान आपल्याला पदाधिकारी तरी बनवा, अशा प्रकारचे लॉबिंग सुरू केले आहे. प्रामुख्याने दौंड, शिरूर, मावळ या तालुक्यांसह भोर, पुरंदरमधून देखील पदासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. आपल्याच तालुक्यातील नेत्याला पद मिळणार याकरिता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, इच्छुकांनी हालचालींना वेग दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखले जात असल्याने अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. यासंदर्भात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग््रेासने एकहाती सत्ता मिळवली आहे
राष्ट्रवादी काँग््रेासचीच एकहाती सत्ता असल्याने अध्यक्षपदाची निवड तुलनेने सोपी मानली जात आहे. मात्र, नाव निश्चित करण्याबाबत अंतिम निर्णयासाठी वरिष्ठपातळीवर सल्लामसलत सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उत्तर आणि दक्षिण पुणे या भागांमधील समतोल राखत अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कारभार सुरू होता. त्यामुळे नव्या अध्यक्षांकडून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे. ग््राामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर नव्या नेतृत्वासमोर मोठी जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधला जात असून, लॉबिंगलाही सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठीचे नाव लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.