
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून, जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व राहणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीने सर्वच पक्षांची ताकद पुन्हा एकदा पणाला लावली आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरी सुमारे 68.89 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी थोडी कमी असली, तरी ही लढत केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय समीकरणं यामुळे पुढचं राज्याचं राजकारण बदलणार आहे.
मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिल्यास तालुक्यांमध्ये मोठा फरक दिसतो. वेल्हे तालुक्यात तब्बल 79.30 टक्के सर्वाधिक मतदान झाले. याउलट बारामतीत केवळ 54.90 टक्के मतदान झालं. बारामतीतील निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, प्रचारातील मर्यादा, स्थानिक वातावरण आणि मतदारांमधील उदासीनता ही संभाव्य कारणं मानली जात आहेत. इतर तालुक्यांमध्येही मतदानाची चित्र बदललं आहे, मावळ, भोर, शिरूर आणि खेडमध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं मतदान झालं.
या निवडणुकीतला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड कायम ठेवणार की विरोधकांना म्हणजेच शिवसेना अथवा भाजपला संधी मिळणार? मागील काही वर्षांत जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलली असून, अनेक ठिकाणी नवं नेतृत्व पुढे आलं आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक नेते, गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित लढती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभा टाळून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आल्याचंही अनेक भागांत पाहायला मिळालं.
जुन्नर : 61.18
आंबेगाव : 65.30
शिरूर : 75.59
खेड : 75.46
मावळ : 77.43
मुळशी : 63.79
हवेली : 68.02
दौंड : 65.00
पुरंदर : 68.37
वेल्हे : 79.30
भोर : 75.62
बारामती :54.90
इंदापूर : 65.67
एकूण 68.89