

प्रसाद जगताप
पुणे: प्रभाग क्रमांक 25 म्हणजेच शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई हा भारतीय जनता पक्षाचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथे ज्या उमेदवाराला भाजपचे तिकीट मिळते तो निवडून येतो, असे काहीसे समीकरण गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले. विशेष म्हणजे, आत्ताही महापालिका निवडणुकीत हेच चित्र पाहायला मिळाले.
भाजपचे या प्रभागातून चार उमेदवार महापालिका निवडणुकांच्या रिंगणात होते. यात स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट आणि कुणाल टिळक यांचा समावेश होता. परंतु, भाजपकडून तिकीट मिळावे, यासाठी अनेकांनी पक्षाकडे अर्ज केला होता. मात्र, पक्षाने या प्रभागात नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली. त्यांनीही निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत प्रभाग 25 मध्ये भाजपचा गड राखला. सर्व चारही उमेदवार निवडून आले.
शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागातील ’अ’ प्रवर्गातून भाजपच्या स्वप्नाली पंडित उभ्या होत्या. त्या 22,987 मतांनी विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात मनसेच्या अमृता भोकरे, रूपाली ठोंबरे-पाटील व अन्य उभे होते. भोकरे यांना 11,480 मते मिळाली, तर ठोंबरे-पाटील यांना 4,532 मते मिळाली. तसेच, या प्रभागातील ’ब’ प्रवर्गातून भाजपचे राघवेंद्र मानकर विजयी झाले. त्यांना 31,981 मते मिळाली. त्यांच्याविरोधात कॉंग््रेासचे समीर गायकवाड, अपक्ष मंदार कारंडे होते. गायकवाड यांना 5,484 मते, तर कारंडे यांना 345 मते मिळाली.
तसेच ’क’ प्रवर्गातून भाजपच्या स्वरदा बापट 26,480 मते घेत विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासच्या राधिका कुलकर्णी, शिवसेनेच्या अक्षता धुमाळ, शिवसेना (उबाठा) च्या शीतल पायगुडे उभ्या होत्या. कुलकर्णी यांना 3,799, धुमाळ यांना 3092, पायगुडे यांना 2483 मते मिळाली. याशिवाय या प्रभागातील ’ड’ प्रवर्गातून भाजपतर्फे कुणाल टिळक उभे होते. त्यांना 24,724 मते मिळाली. त्यांच्याविरोधात रा. काँ.चे सुनील खाटपे, मनसेचे नीलेश हांडे, काँग््रेासचे निरंजन दाभेकर उभे होते. खाटपे यांना 4,743, हांडे यांना 3,611, काँग््रेासच्या दाभेकर यांना 2,825 मते मिळाली.
भाजपच्या नवीन चेहऱ्यांना मतदारांचा कौल
विविध पक्षांचे उमेदवार भाजपच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु, अखेर भाजपने संधी दिलेल्या नव्या चेहऱ्यांना या प्रभागात मतदारांनी विजयी कौल दिला आणि सर्वत्र भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात भाजपचेच चारही उमेदवार विजयी झाले अन् कमळ फुलले.