

पुणे: विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत बैठका घेण्याची मुभा मिळाल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या समस्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
शहरातील अनेक भागांमध्ये गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी बैठकीत उपस्थित केला. विशेषतः उपनगरांतील सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका सदस्यांनी केली.
पावसाळापूर्वी जलवाहिन्यांची तपासणी करून गळती आणि तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. यासोबतच शहरातील अनेक भागांमध्ये तीव पाणीटंचाई निर्माण झाल्याचेही सदस्यांनी निदर्शनास आणले.
नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे सांगण्यात आले. काही भागांत टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाण्याची मागणी वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसाळापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेज लाइन दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिल्या. सखल भागांमध्ये पाणी साचू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.