

पुणे: राज्यासह पुण्यातही उन्हाचा पारा चांगलाच चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग््राहालयातील वन्यजीवांसाठी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाकडून विशेष ‘समर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत वन्यजीव व पर्यटकांना येत्या उन्हाळ्यात उन्हाचा ताण जाणवू नये, या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येणार आहेत.
प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये आधुनिक फॉगर सिस्टिम, कूलर्स आणि स्प्रिंकलर्स बसवण्यात आले आहेत. वाघ आणि बिबट्या यांच्या अधिवासात पाण्याचे कारंजे आणि कृत्रिम पावसाचे स्प्रिंकलर्स सुरू करण्यात आले आहेत. अस्वलांच्या पिंजऱ्यात कूलर्सची व्यवस्था केली असून, हत्तींना दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घातली जात आहे. तसेच, त्यांच्यावर पाण्याचे फवारे देखील फवारले जात आहेत. अनेक पिंजऱ्यांमध्ये पाण्याचे नैसर्गिक डबके तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून प्राणी त्यात बसून स्वतःचे शरीर थंड ठेवू शकतील.
पर्यटकांसाठी उन्हात मंडपाचा आसरा
प्राणिसंग््राहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. भर उन्हात पर्यटकांना रांगेत उभे राहावे लागू नये आणि उन्हाचा चटका बसू नये, यासाठी प्रवेशद्वारावर सावली देणारा एक भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
प्राण्यांना रसाळ फळे, ग्लुकोजयुक्त आहार
फक्त बाह्य उपाययोजनाच नाही, तर प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला आहे. त्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आहारात रसाळ फळे, ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाईटयुक्त पाण्याचा समावेश करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे वन्यजीवांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. प्राण्यांना नैसर्गिक वातावरणाप्रमाणे थंडावा मिळावा आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ही सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे प्राणिसंग््राहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.