

सुवर्णा चव्हाण
पुणे: ‘टपाल खात्यात 35 वर्षे झालीत. 19 वर्षांपासून पोस्टमन म्हणून काम करतोय. आधी सायकलवरून पत्रं वाटायचो, आता गाडी आली. पण, मेहनत काही कमी झालेली नाही. ऊन, वारा, पाऊस काहीही असो... आम्ही घरोघरी पत्रं आणि पार्सल पोहोचवतो.
सकाळी सुरू झालेले काम सायंकाळपर्यंत सुरूच असते. कधी शरीर थकते, मनही थकून जाते... पण, लोकांची सेवा करायची आहे, हा विचार पुन्हा उभं राहण्याचे बळ देतो,’ अशा शब्दांत वानवडी विभागातील पोस्टमन विजय बबन दांडेकर यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा अनुभव सांगितला.
उन्हातान्हात कष्टाचे काम
जवळपास 70 ते 80 पत्रं, पार्सल एक पोस्टमन दररोज घरोघरी पोहोचवतो. वाढतं तापमान, पाऊस, वाहतुकीची कोंडी आणि वाढतं कामाचं ओझं... या सगळ्यांवर मात करत पोस्टमन रोज अनेक किलोमीटरचा प्रवास करतात.
त्यांच्या कष्टामुळेच टपालसेवा आजही लोकांच्या विश्वासाची राहिली आहे. लोकांच्या हातात पत्र देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य, वृद्धांच्या डोळ्यांत दिसणारी समाधानाची चमक आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या निकालाचं पत्र देताना दिसणारी उत्सुकता...
हे क्षणच आम्हा पोस्टमनच्या कष्टांना अर्थ देतात. ‘पत्र दिल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, त्यातूनच आम्हाला काम करण्याची ताकद मिळते,’ असे पोस्टमन विजय बबन दांडेकर यांनी सांगितले.