Pune News : भगदाडे पडून मुठा कालव्याची झाली चाळण

Pune News : भगदाडे पडून मुठा कालव्याची झाली चाळण

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणापासूनच जागोजागी भगदाडे पडून तसेच भराव खचून मुठा कालव्याची चाळण झाली आहे. त्यामुळे कालव्यात एक हजार क्सुसेक वेगाने पाणी सोडताना दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. खडकवासलाच्या लाभक्षेत्रातील हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील 66 हजार हेक्टर शेती तसेच पिण्यासाठी शनिवार (दि. 25) पासून पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. गेल्या 8-10 वर्षांपासून कालव्यातून गळती होऊन भगदाडे पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग आवर्तन काळात अधिक सतर्क झाले आहे. खडकवासलापासून फुरसुंगीपर्यंत बोगद्यातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत खडकवासलातून भगदाडे पडून चाळण झालेल्या मुठा कालव्यातूनच शेती व पिण्याला पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्यात पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या बंदिस्त जलवाहिन्या आहेत. त्यामुळे एकाच कालव्यावर शेती व पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

नवीन मुठा कालवा 60 वर्षांपूर्वीचा आहे. कठडे, भराव खचून तसेच भगदाडे पडून त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे आवर्तन देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. धरणाच्या भिंतीपासून कालव्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांचा विळखा आहे. जनावरांच्या गोठ्यापासून बेकायदा दारू, अमलीपदार्थ विक्री, मटका-जुगाराचे अड्डे तेथे राजरोसपणे सुरू आहेत. जलसंपदा विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने जलसंपदा विभागाची धायरी फाटा, नांदेड, खडकवासला आदी ठिकाणच्या इमारती, जागा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

कालवा 60 वर्षांहून अधिक जुना आहे. पाण्याची गळती होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी दुरुस्ती तसेच देखरेख केली जाणार आहे. नियमितपणे कालव्यातून पाणी सोडले जात आहे. मोठा धोका नाही.

– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news