पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्त संकलनात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. राज्यात पंधरा दिवसांमध्ये 1 लाख 12 हजार 811 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी 4954 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 27 हजार रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 16 लाख रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. महाराष्ट्रानंतर रक्त संकलनात गुजरात आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पखवाडा' साजरा करण्यात आला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित झाले, अशी माहिती राज्य संक्रमण परिषदेचे डॉ. महेंद्र केंद्रे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली. संक्रमण परिषदेअंतर्गत राज्यामध्ये 250 परवानाधारक व नोंदणीकृत रक्तपेढ्या कार्यरत आहेत. रक्त संकलन, रक्ताची तपासणी व त्याचे वितरण परवानाधारक रक्तपेढ्यांमार्फत केले जाते. यापैकी 31 मोठ्या रक्तपेढ्या आहेत व 41 रक्तपेढ्या जिल्हा पातळीवर आहेत. रक्तपेढ्यांचे वर्गीकरण रक्तसंकलनाच्या आधारे करण्यात येते.
हेही वाचा