पुणे महापालिका करणार पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग रचना

पुणे महापालिका करणार पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग रचना
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिका आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना करणार आहे. प्रभाग रचनेबाबत या आदेशात स्पष्टता नसली, तरी महापालिकेने मात्र तीन सदस्यीय पद्धतीनेच प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची कार्यवाही आजपासून सुरू होणार आहे. आगामी निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत.

मात्र, या आदेशात नक्की किती सदस्यीय संख्येने ही रचना करायची, याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना नाही. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय पद्धतीने, तर शिंदे-फडणवीस सरकारने 2017 च्या रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

यासंदर्भात गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने बोलवलेल्या ऑनलाईन बैठकीत यावर चर्चा झाली नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने आता तीन सदस्यीय संख्येनुसारच नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गुरुवारी वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. याबाबत शुक्रवारी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक होणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ही रचना 2011 च्या लोकसंख्येनुसार केली जाणार आहे. त्यामुळे सदस्य संख्या 166 इतकी होणार आहे. यापूर्वी वाढीव लोकसंख्या गृहीत धरून 173 सदस्य संख्येने प्रभाग रचना करण्यात आली होती. आता ही संख्या पुन्हा 7 ने घटणार असून, 2017 च्या तुलनेत केवळ दोनच सदस्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा अपेक्षांभग होणार आहे.

मतदार याद्या 2022 च्या लोकसंख्येनुसार
प्रभाग रचना जरी 2011 च्या जनगणनेनुसार होणार असली, तरी मतदार याद्या मात्र 2022 च्या लोकसंख्येनुसार कराव्या लागणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रभागांत लोकसंख्येच्या तुलनेत मतदार अधिक अशी परिस्थिती होणार आहे. तसेच, आता महापालिका निवडणूक 2023 मध्येच होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेनुसार कट ऑफ डेटची मतदार संख्या विचारात घेऊन याद्या मतदार फोडाव्या लागतील. त्यानंतर प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे.

किमान 60 दिवसांचा कालावधी
पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी किमान 58 ते 60 कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर त्याची प्रसिद्धती , त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया, अंतिम रचना, प्रभागांमधील आरक्षण सोडत काढून प्रभागासह अंतिम रचना जाहीर करणे, अशी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news