

पुणे: गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी रस्ते चकाचक करण्याची लगबग महापालिकेने सुरू केली असली, तरी याच मार्गावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. उखडलेले पेव्हर ब्लॉक, तुटलेले पदपथ आणि ठिकठिकाणी निर्माण झालेले अडथळे यामुळे मिरवणूक मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढताना आधीच त्रस्त असलेल्या पुणेकरांना आता चालण्यासाठीही रस्त्यावर उतरावे लागत आहे.
पदपथांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, अनेक ठिकाणी त्यानुसार कामेही करण्यात आली आहेत. मात्र, रस्त्यांच्या कडेला असलेल्या पदपथांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. वाहनांसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ अशी मूलभूत व्यवस्था असतानाही पादचाऱ्यांनी सुरक्षितपणे चालायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजीराव रस्त्यावरील पदपथांची अवस्था याचे ठळक उदाहरण आहे.
नूमवि शाळेसमोरील पदपथासह मुख्य मिरवणूक मार्गावरील अनेक
ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. काही ठिकाणी पदपथाचा भाग तुटल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना अपघाताचा धोका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवात मुख्य मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावर येणार आहेत.
त्यामुळे या मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता असतानाही पदपथांची दुरवस्था कायम राहणे, हे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा धावपळ करीत असताना पादचाऱ्यांच्या वाटेतील खड्डे आणि अडथळे प्रशासनाला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
पदपथ किमान चालण्यायोग्य तरी करा
मिरवणूक मार्गाचे सुशोभीकरण आणि वाहतूक नियोजनाच्या घोषणा होत असताना नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक असलेले पदपथ मात्र दुरुस्त केले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मिरवणुकीपूर्वी मुख्य मार्गावरील उखडलेले पेव्हर ब्लॉक, तुटलेले भाग आणि इतर अडथळे तातडीने दूर करून पदपथ पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.