

पुणे: राज्यात मान्सून सक्रिय होऊन पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पपईला मागणी वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पपईच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली. याउलट मागणी घटल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या मागणीत घट झाल्याने त्यांच्या भावात किलोमागे चार ते पाच रुपयांनी घट झाली.
मागणीअभावी जांभळाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी तर लिंबूच्या भावात 15 किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी घसरण झाली आहे. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे डाळिंबाच्या प्रतवारीत सुधारणा होऊ लागली आहे.
याखेरीज, बाजारात डाळिंबाची आवकही वाढली आहे. बाजारात हैदराबाद येथून मोसंबी आणि संत्रीची आवक सुरू आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात सर्व प्रकारच्या फळांची आवक साधारण आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने फळांना उठाव कमी आहे. आवक- जावक कायम असल्याने उर्वरित सर्व फळांचे भाव कायम असल्याचे सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. ५) लिंबू १००० ते १२०० गोणी, मोसंबी १५ ते २० टन, संत्रा १ ते २ टन, डाळिंब 30 ते ३५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू १०० गोणी, पेरु ५०० ते ६०० क्रेट आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २०० ते ५००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५० (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : (१० किलो) : 3००-९००,
डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-२८०, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-३०, कलिंगड : १५-१८, खरबूज : १५-30, पपई : १५-३५, चिक्कू (दहा किलो) : १००-१०००, पेरु (२० किलो) : २००-४००, अननस (१ डझन) : १००-६००, आंबा : बदाम (एक किलो) २0 ते 30, तोतापुरी २0 ते २५, निलम २0 ते ३0. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ६० ते १००.