

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभयारण्यासह विविध ठिकाणी वर्षभरात वन्यप्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. मात्र, पुणे वन विभागाला या दिवसाचे गांभीर्यच नसल्याने या वर्षी प्राण्यांची गणना होणार नसल्याची माहिती वन अधिकार्यांनी दिली.
पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये कोणकोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे, यासह अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी मात्र, ही गणनाच होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही आदेश आला नसल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच ठशांचा अभ्यास करून वन्यप्राण्यांची गणना केली जाते. पारपंरिक वन्यप्राणी गणनेविषयी प्राणीप्रेमींना खूप आकर्षण आहे. यातून मिळणारी वन्यप्राण्यांची आकडेवारी अचूक नसली, तरी नव्याने दाखल झालेले वन्यप्राणी अथवा कमी झालेल्या एखाद्या प्राण्याविषयी मिळालेली माहिती नक्कीच उपयोगी ठरते.
विदर्भामध्ये अवकाळी पावसाच्या अंदाजासोबतच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात होणारी प्राणी गणना वनविभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे.
प्राणी गणना करण्यासंदर्भात पुणे वन विभागाकडून कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून त्यासंदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे कोणतीही प्राणी गणना होणार नाही.
राहुल पाटील,
उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग