

पुणे : प्रेम संबंधास विरोध केल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण राजगड पोलिसांकडून तिघांना अटक केली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता.
सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती तेथे फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर राजगड पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी चैाकशी करून मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा मृतदेह सौरभ आठवले याचा असल्याची माहिती मिळाली. सौरभ १८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी राजगड पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी सौरभचे मित्र, नातेवाईकांकडे चौकशी केली. तेव्हा खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नव्हते. तांत्रिक तपासात सौरभचा खून अल्पवयीनांनी केल्याची माहिती पोलिस कर्मचारी नलावडे यांना मिळाली. आरोपी कात्रज घाटपरिसरातील गोगलवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
मांगडेवाडी परिसरात अल्पवयीन त्याच्या आत्त्याकडे राहत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. सौरभ याच परिसरात राहत होता. तो मुलीला बहीण मानायचा. तो तिला दररोज शाळेत सोडायचा. त्याने मुलीच्या प्रेम प्रकरणाची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आत्त्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे राहायला गेला. सौरभमुळे प्रेमसंबंधात अडथळे आल्याने अल्पवयीन चिडला होता. त्याने साथीदारांच्या मदतीने सौरभच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर सौरभला त्यांनी कात्रज बोगद्याजवळ भेटण्यास बोलावले. सौरभला डोंगरावर नेऊन आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलिस तपासात ही माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाईल संच आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, पोलिस कर्मचारी सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुल कोल्हे,अजित माने, नीलेश राणे, अमोल तळपे, अजित मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भंडाळे, मंगेश कुंभार यांनी ही कामगिरी केली.