

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पुणे विभागातील असंख्य परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) तपासणी प्रक्रिया रखडली आहे. या प्रश्नावर रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
1 फेबुवारी 2026 पासून ऑनलाइन वाहन प्रणालीवर नोंदणी बंद झाल्याने रिक्षा, एसटी, पीएमपीएमएल बस आणि मालवाहू वाहन पासिंगविना उभी आहेत. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाने स्वयंचलित चाचणी केंद्रातच फिटनेस तपासणी अनिवार्य केली असली, तरी पुण्यातील संबंधित केंद्राचे काम कंत्राटदाराने अद्याप पूर्ण केलेले नाही. यामुळे मुदत संपलेली वाहने रस्त्यावर धावत असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे एटीएस केंद्र सुरू होईपर्यंत जुन्या पद्धतीनेच तपासणी प्रक्रिया सुरू ठेवावी. रिक्षा व छोट्या टेपोंना लांबच्या अंतरावरील केंद्रावर न पाठवता, आळंदी रोड येथील कार्यालयातच तपासणीची सोय करावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीकडून यावेळी दिलेल्या निवेदनात केल्याचे पवार यांनी सांगितले. या शिष्टमंडळात रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, शैलेंद्र गाडे, प्रकाश वाघमारे, बाळासाहेब पोकळे यांसह अन्य प्रतिनिधींचा समावेश होता.