

पुणे: कर्नाटकातून पुण्याच्या बुधवार पेठेत आलेले संशयित भेसळयुक्त पनीर आणि खव्याचे चार ट्रक अन्न, औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केले. हा साठा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला असून, त्यानुसार पनीर आणि खवा पाठवणाऱ्यांपासून ते खवा मागवणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी सांगली विभागातील पथकाने ही कारवाई केली असून, याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मात्र, या कारवाईनंतर गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. राज्यात एफडीएकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कारवायांचा धडाका सुरू आहे. पुण्यात परराज्यासह अन्य जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पनीर आणि खवा आणला जात असल्याची माहिती एफडीएच्या आयुक्त कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून या माहितीची पडताळणी करण्यात येत होती. अखेर विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे साडेपाचपासून बुधवार पेठ परिसरात पाळत ठेवली. सकाळी ६ च्या सुमारास पनीर आणि खवा घेऊन आलेली वाहने अडवून तपासणी करून वाहने ताब्यात घेण्यात आली.
या कारवाईत २७ लाख ८३ हजार रुपये किमतीचे १२ हजार ५०० किलो पनीर, तर ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा चार हजार ६०० किलो खवा जप्त केला. हे पनीर कर्नाटकातून, तर खवा बार्शी येथून आणण्यात आला होता, असे एफडीएचे सहायक आयुक्त नीलेश मसारे यांनी सांगितले. यामध्ये तीन प्रकारचे पनीर होते. तसेच पनीर आणि खव्याचे पॅकिंग योग्य प्रकारे केले नव्हते. जप्त केलेले पदार्थ नष्ट करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिले आणि पुरवठ्याच्या कागदपत्रांचीही तपासणी
बुधवार पेठेत येणारे पनीर आणि खवा हे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांत वितरित केले जाते. त्यानुसार पनीर आणि खवा मागवणाऱ्या व्यापाऱ्यांची बिले व पुरवठ्याची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असे एफडीए प्रशासनाने सांगितले.
व्यापारी रडारवर
एफडीएने शुक्रवारी जप्त केलेले पनीर शहरातील २५ ते ३० व्यापाऱ्यांनी मागवले होते, तर खवा ३० ते ३५ व्यापाऱ्यांनी मागवला होता, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आता या व्यापाऱ्यांकडून खरेदीची माहिती घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.
व्यापाऱ्यांकडून मागवण्यात किंवा पाठवण्यात येणाऱ्या मालाची केवळ तपासणीच नाही, तर जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि विक्रेत्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, याची काळजी घ्यावी. आगामी काळात ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न, औषध प्रशासन, महाराष्ट्र