भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : निरगुडे (ता. इंदापूर) येथे मागील पाच दिवसांपासून शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याची खंत उपोषणकर्ते भगवान खारतोडे यांनी व्यक्त केली. खारतोडे म्हणाले, संपूर्ण कर्जमाफी करावी, पिक विमा रक्कम त्वरित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावी, दुष्काळी स्थितीमुळे चारा छावण्या व चारा डेपो सुरू करावा, सर्वच भागात दुष्काळ जाहीर करावा, शेतीपंपांचे वीज बिल माफ करावे, शेततळ्यांच्या खोदाई व अस्तरीकरणाच्या अनुदानात वाढ करावी, दुष्काळी स्थितीमुळे दुप्पट अन्नधान्याची योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी 10 जानेवारीपासून खरतोडे यांनी उपोषण सुरु केले आहे.
आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी दर शुक्रवारी निरगुडे उपकेंद्रामध्ये उपस्थित राहतील ही मागणी मान्य केली आहे. कृषी अधिकारी यांनी मागण्या शासनाकडे पाठविल्याचे सांगितले. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे तोपर्यंत चारा उपलब्ध होणार आहे. कारखाने बंद झाल्यानंतर चार्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच चार्याचे नियोजन करावे अशी मागणी खारतोडे यांनी केली.
हेही वाचा