उंडवडी, पुढारी वृत्तसेवा: शिर्सुफळ ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता कित्येक वर्षांपासून रखडला होता. या वर्षी नवीन रस्ता झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु रस्ता होताच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पुन्हा शेतकर्यांना खराब रस्त्याने जावे लागत आहे. दोन महिन्यांतच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्ता खचला आहे. ठेकेदाराकडून हा रस्ता पुन्हा बनवून घेऊन त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झाले आहे. रस्त्यासाठी 20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून काही भाग खचला आहे. निकृष्ट कामामुळे या रस्त्यावर खर्च करण्यात आलेले 20 लाख रुपये पाण्यात गेले आहेत. तसेच साईडपट्ट्यादेखील या ठिकाणी तयार केलेल्या नाहीत. ठेकेदाराने निकृष्ट काम केल्यामुळे रस्ता उखडला असून, याचा नाहक त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता येथील नागरिक करीत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायतीसाठी भरपुर निधी दिला आहे. परंतु, संबंधित पदाधिकारी व ठेकेदार यांचे लागेबांधे असल्याने व टक्केवारीचा हिशेब सुरू असल्याने गावाचा विकास होत नाही. या रस्त्याच्या कामांची चौकशी करावी.
– अतुल हिवरकर, माजी सरपंच, शिर्सुफळ