

पुणे: फळांचा राजा असलेल्या कोकणातील हापूसचा हंगाम संपत आल्याने नागरीकांनी अन्य फळांच्या खरेदीकडे आपला मोर्चा वळविण्यास सुरवात केली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने डाळिंबाच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे.
मॉन्सून देशाच्या वेशीवर येऊन ठेपल्याने येत्या काळात लिंबाला भाव मिळणार नाही, या शक्यतेने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणी अभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 24) लिंबूची 1000 ते 1500 गोणी, मोसंबी 20 ते 25 टन, संत्रा 1 टन, डाळींब 25 ते 30 टन, पपई 19 ते 20 टेम्पो, कलिंगड 25 ते 30 टेम्पो, खरबूज 10 ते 15 टेम्पो, चिक्कू 1 हजार गोणी, पेरू 200 ते 300 क्रेट, अननस 5 ट्रक आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 300 ते 1200, मोसंबी : (3 डझन) : 250-450, (4 डझन) : 150-300, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-250, आरक्ता : 10-50, गणेश : 5-30,
कलिंगड : 5- 15, खरबूज : 10-35, पपई : 5-20, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-700, अननस (1 डझन): 100-600, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (कच्चा) : 1200-2000, रत्नागिरी हापूस 5 ते 9 डझन (तयार) : 1500 ते 3000.