पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (आरकेव्हीवाय) द्राक्ष पिकासाठी गारपीट, अवकाळीपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 100 हेक्टर क्षेत्राचा हा प्रकल्प असून, खर्चाच्या 50 टक्क्यांइतके अनुदान शेतकर्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आरकेव्हीवायमधून 6 कोटी 14 लाख 4 हजार रुपयांइतक्या अनुदान निधीस मंजुरी देण्यात आली आहे. द्राक्ष उत्पादक प्रमुख 8 नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. महाडीबीटी प्रणालीवर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी : नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांतील शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt. maharashtra. gov.in) वर संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ उतारा, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकर्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा आदींची आवश्यकता आहे.