तळेगाव दाभाडे : अंत्यविधीची रक्षा नदीपात्रात विसर्जन करण्याची परंपरा थांबवणे कठीण आहे. कारण ही रुढी भावनिक आहे. नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात रक्षा विसर्जन न करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आणि आपल्या वडिलांच्या अंत्यविधीनंतरची रक्षा नदीत विसर्जिन न करता ती झाडांना वापरून वडिलांच्या स्फूर्ती जपल्या आहेत. कान्हेवाडी तर्फे चाकणचे (ता. खेड) सरपंच भाऊसाहेब पवार यांनी त्यांचे वडील हभप एकनाथ महिपती पवार यांच्या अंत्यविधीनंतर वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता परिसरातील वड, पिंपळ, चिंच आदी देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे.
सरपंच पवार यांचे वडील एकनाथ पवार यांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या संस्कारातून आम्ही घडलो, त्यांचे संस्कार आणि शिकवणीतून समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या आशीर्वादाने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. वडिलांच्या प्रति असलेल्या श्रद्धेतूनच त्यांच्या स्मृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या भावना सरपंच पवार यांनी व्यक्त केल्या.
घरातील चुलीची राख आपण खत म्हणून शेतात वापरत असतो. गावांमधून या उपक्रमाचे अनुकरण करावे म्हणजे नदीचे पाणी दूषित होणार नाही व वृक्षांनाही खत मिळेल. या वेळी रक्षा विसर्जन विधीसाठी आलेल्या नातेवाईक भावकी, गावकी परिसरातील ग्रामस्थांनी याचे अनुकरण करावे
– भाऊसाहेब पवार, सरपंच
अनेक झाडांचे रोपण
दत्तात्रय पवार, कैलास पवार, संभाजी पवार, शिवाजी पवार यांनी एकनाथ पवार यांच्या स्मृतिपीत्यर्थ झाडांची लागवड केली आहे. तसेच, या वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी पवार कुटुंबीयांनी घेतली आहे. कान्हेवाडी तर्फे चाकण या गावामध्ये आतापर्यंत ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पाणी व्यवस्था अशा विविध विकासकामांबाबत राज्य पातळी राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावून एक आदर्श गावाचा दर्जा प्राप्त केला आहे.