पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वेगात वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील दाट लोकवस्तीमुळे खासगी वाहनांची संख्या भरमसाट वाढत आहे. वाहतूक कोंडी, ध्वनी, वायू व जल प्रदूषणात वाढ, मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या, तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. पुण्याप्रमाणे कचर्याची समस्या जटिल होऊ नये म्हणून शहराला नव्या कचरा डेपोची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी वेळीच व्यवस्था निर्माण न केल्यास पिंपरी-चिंचवड शहराची कचरा समस्या पेटू शकते.
पुनावळे येथील जागा ताब्यात आल्यानंतर कचरा डेपो उभारण्याबाबत कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित डेपो तयार केला जाणार आहे. त्यासाठी सीमा भिंत टाकण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. इंदूर शहराच्या कचरा डेपोच्या धर्तीवर हा डेपो निर्माण केला जाणार आहे. वनक्षेत्र असल्याने तेथे झाडांची संख्या मोठी आहे. त्याच्या मधोमध हा प्रकल्प असणार आहे. त्यामुळे डेपोतून दुर्गंधी निर्माण होणार नाही. त्याचा रहिवाशांना त्रास होणार नाही, असा अधिकार्यांनी दावा केला आहे.
मोशी डेपोत सन 1991 पासून म्हणजे 33 वर्षांपासून संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकला जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून अनेक डोंगर तयार झाले आहेत. सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वी गाडलेला कचरा हटविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बायोमायनिंग केले जात आहे. कचर्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे संकट महापालिकेसमोर आहे. अन्यथा पुणे शहरातील फुरंसुगी कचरा डेपोप्रमाणे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पुनावळे येथे कचरा डेपोचे आरक्षण आहे. शहराची गरज लक्षात घेऊन तेथे दुसर्या कचरा डेपो विकसित करण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार डेपो निर्माण केला जाईल. तेथे शहराचाच कचरा असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक स्वरूपाचा हा डेपो असेल. तेथे कचर्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. डेपो विकसित करण्यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधींची मते लक्षात घेण्यात येतील. त्यांना विश्वासात घेऊन कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा