

आळेफाटा: पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हादरला असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (दि. २७) पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना, “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजाच्या माथी कलंक लावणारी आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेसमवेत आमदार शरद सोनवणे यावेळेस उपस्थित होते. घटना घडल्याच्या दिवशीच पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती पावले तातडीने उचलण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीडित कुटुंबीय तसेच ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. शबरी गुरुकुल योजनेअंतर्गत तरतूद करून पीडित कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत १० लाख रुपयांची आर्थिक मदत आजच पीडित कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
“पीडित कुटुंबाच्या मुलांच्या भवितव्याची काळजी शासन घेणार असून, त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार,” असे आश्वासनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले. ग्रामस्थांच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. पिंपळवंडी परिसरात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देताना, गावात तातडीने हायमॅक्स दिवे बसविण्यासह सीसीटीव्ही व आवश्यक विद्युत व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिबट्याच्या हल्ल्यातील पीडितांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत दिली जाते; त्याच धर्तीवर अशा गंभीर गुन्ह्यांतील पीडित कुटुंबांनाही आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, माजी अध्यक्ष देवराम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे सरपंच मेघाताई काकडे, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, बाजार समिती संचालिका प्रियंकाताई शेळके, माजी पंचायत समिती सदस्य श्याम माळी, माजी सरपंच सोमनाथ माळी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार रंजीत भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.