भिगवण: सरकार आणि कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे उजनी धरणाच्या चोहोबाजूच्या नागरिकांना पाणी नव्हे तर मलमूत्र पिण्याची वेळ आली आहे. लोकशाहीतील हा कसला व कोणाचा विकास म्हणायचा? हा विकास नसून विनाश आहे.
नागरिकांना मलमूत्र प्यावे लागत असेल तर भारताची सभ्यता व संस्कृतीमुळे भारत जर स्वतःला गुरू समजतो तर तो म्हणण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असे परखड मत जलपुरुष व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी ‘उजनी’ भेटी वेळी व्यक्त केले. (Latest Pune News)
राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण पाणलोट क्षेत्राला भेट दिली, ते म्हणले की, ‘उजनी’तील पाणी व परिसर रासायनिक पदार्थांमुळे विषारी बनला आहे. ज्या लोकांनी मतदान केले, राज्य करण्याचा अधिकार दिला त्यांनाच मलमूत्र पाजले जात आहे.
भारतातील सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड आहे, त्यांचेच रासायनिक व मलमूत्रयुक्त पाणी ‘उजनी’त येते आणि नागरिक त्या पाण्यामुळे आजारी पडत आहेत, रोगी बनत आहेत. कॅन्सर, त्वचा आदी रोग पसरत आहेत. शेती, जनावरे, मासे हेही प्रदूषित पाण्याचे शिकार होत आहेत.
राजेंद्र सिंह म्हणाले, पुण्यातील नागरिकांना 3 रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी मिळते, असे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत व इकडे ‘उजनी’च्या चोहोबाजूंना वीस लिटरला वीस रुपये मोजावे लागत आहेत. सरकारची ही भूमिका दुटप्पी आहेच शिवाय ती लोकशाहीसाठी चांगली नाही. लोकशाहीत अन्न व पाण्यावर समान हक्क आहे तर मग पुणे व ‘उजनी’साठी ‘डबल गेम’ का असाही प्रश्न त्यांनीउपस्थित केला.
20 टीएमसीमुळे 117 टीएमसी पाणी विषारी राजेंद्र सिंह म्हणाले, पुणे वपिंपरी-चिंचवड ही शहरे वर्षाला 20 टीएमसी पाणी वापरतात तर उजनीत 117 टीएमसी साठा आहे. हे 20 टीएमसी पाणी 117 टीएमसी पाण्याला विषारी बनवत असेल तर हा कसला विकास ? हा तर विनाश आहे, असे खडेबोल त्यांनी सुनावले.