वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोऱ्यात गुरुवारी (दि. ११) पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजता पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरण १०० टक्के भरून वाहू लागले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली. सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून १८हजार ७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पानशेतच्या सांडव्यावरील पानशेत बाजारपेठ पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली. पाण्याच्या लाटा थेट पुलाच्या कठड्याला धडकुन रस्त्यावर पाणी वाहत होते. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वेल्हे पोलीसांनी पुल व धरण परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पानशेतमधुन विसर्ग सुरू झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी पानशेतच्या पुलावर तसेच वांजळवाडी सांडव्यावर गर्दी केली होती. स्थानिक कार्यकर्ते वसंत चऱ्हेकर, विजय निवंगुणे आदीं नागरिकांना सुचना देत होते. पानशेत पाठोपाठ वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेतमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे खडकवासला धरणही भरून वाहू लागले. त्यामुळे खडकवासलातुन मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता खडकवासलातुन ९४१६ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते.
याबाबत वेल्हेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम म्हणाले, पानशेत धरणातुन मोठ्या प्रमाणात निसर्ग सुरू आहे. पानशेत परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. खबरदारीसाठी मुख्य रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, पहाटेपासून वरसगाव, पानशेत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले, त्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. पानशेत १०० टक्के भरल्याने जादा पाणी सोडले जात आहे. वरसगावही आज मध्यरात्रीनंतर १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. खडकवासलात पाण्याची आवक वाढल्याने मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान दुपारी तीन नंतर खडकवासला, सिंहगड भागात पावसाचा जोर ओसरला; मात्र पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून अधुनमधून सरी कोसळत आहेत. बुधवारी (दि. १०) सकाळी सहा ते गुरुवारी (दि. ११) सकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासात खडकवासला येथे २८, पानशेत येथे ८७, वरसगाव येथे ८९ व टेमघर येथे १७२ मिलीमीटर पाऊस पडला.