पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने उशिराने हजेरी लावली असली तरीसुध्दा भाताची लागवड 90 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर सोयाबीनची दुप्पट क्षेत्रावर पेरणी झालेली असून, खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या 81 टक्क्यांइतक्या पूर्ण झालेल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. भाताच्या लागवडी सरासरी क्षेत्राइतक्या निश्चित होतील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम सरासरी क्षेत्र 1 लाख 95 हजार 710 हेक्टरइतके आहे. 10 ऑगस्टअखेरच्या ताज्या अहवालानुसार त्यापैकी 81 टक्के म्हणजे 1 लाख 58 हजार 89 हेक्टरवरील पिकांचा पेरा पूर्ण झालेला आहे. मक्याची पेरणी 19 हजार 202 हेक्टरवर (102 टक्के) झालेली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 20 हजार 982 हेक्टर असून, प्रत्यक्षात दुप्पट म्हणजे 43 हजार 122 हेक्टरवर (206 टक्के) पेरा पूर्ण झालेला आहे. इतर गळितधान्यांची पेरणी तुलनेने 23 टक्क्यांइतकीच झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. भात लागवडीस मागील दोन ते तीन आठवड्यात चांगला वेग आलेला आहे. भाताचे सरासरी क्षेत्र 59 हजार 627 हेक्टरइतके आहे. तर प्रत्यक्षात 53 हजार 508 हेक्टरवर भात लागवडी पूर्ण झालेल्या असून, उर्वरित क्षेत्रावरील लागवडीही पूर्ण होण्याची अपेक्षाही काचोळे यांनी व्यक्त केली.
तूर, मूग, उडदाचा पेरा कमीच…
जून महिना कोरडा गेल्यामुळे विशेषतः तूर, मूग, उडदाचा पेरणीचा हंगाम बर्यापैकी वाया गेला. त्यामुळे चालू वर्षी या तीनही पिकांच्या पेरण्या लक्षणीयरीत्या घटल्या आहेत. तुरीचे सरासरी क्षेत्र 2 हजार 33 हेक्टर असताना 648 हेक्टर (32 टक्के), मुगाचे सरासरी क्षेत्र 14 हजार 961 असून, प्रत्यक्षात 4 हजार 855 हेक्टर (32 टक्के) आणि उडदाचे सरासरी क्षेत्र 1 हजार 715 हेक्टर असून, 921 हेक्टरवर (54 टक्के) पेरा पूर्ण होऊ शकलेला आहे. याशिवाय बाजरीचे सरासरी क्षेत्र 47 हजार 518 असून, 45 टक्के क्षेत्रावर म्हणजे 21 हजार 314 हेक्टरवरच पेरणी होऊ शकलेली आहे.
हे ही वाचा :