

पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत सहा लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय जाहीर केले आहे. यामध्ये पुणे विभागाअंतर्गत तीन लाख 81 हजार 86 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती. (Latest Pune News)
परंतु, त्यावर रात्रंदिवस काम सुरू होते. अखेर प्रवेशाची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर केली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्राप्त महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठी 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या दोन लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या दोन लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या सहा लाख नऊ हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते.
अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांपैकी सहा लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केले आहेत.पुणे विभागाअंतर्गत एक लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर केले. अहिल्यानगर जिल्ह्यात 99 हजार 780 जागा उपलब्ध आहेत.
त्यापैकी 29 हजार 568 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. पुण्यात दोन लाख 11 हजार सहा जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 62 हजार 812 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. तर सोलापूरमध्ये 80 हजार 200 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 23 हजार 911 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेपैकी सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेसाठी 68 हजार 272 प्रवेश जाहीर झाल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात प्रवेशासाठी चांगलीच चुरस
पुण्यातील फर्ग्युसन, बीएमसीसी, पूना कॉलेज, आपटे प्रशाला आदी नामवंत महाविद्यालयांमध्ये पहिल्याच फेरीत उपलब्ध जागांच्या तब्बल 80 टक्के जागांवर प्रवेश जाहीर झाले आहेत. संबंधित महाविद्यालयांमध्ये 81 ते 96 टक्क्यांचा कटऑफ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये यंदाही कटऑफ चांगला असल्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.