

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेला सहा खासदारांचा आकडा सोमवारी अखेर पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे ओमराजे निंबाळकर यांनी बाजू बदलल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ओमराजे यांनी मंगळवारी रात्री खासगी विमानाने पुणे–मुंबई मार्गे दिल्ली असा प्रवास करत राजधानी गाठली.
ओमराजे निंबाळकर हे मध्यरात्री पुण्यावरून नवी मुंबई विमानतळावर येणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी पुण्यावरून थेट मुंबई आणि तेथून थेट दिल्ली असा प्रवास केला. ओमराजे हे चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओमराजे यांची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सोपविण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनेच ओमराजे निंबाळकर दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त (ता. १९ जून) ठाकरे गटातील फुटलेले सहा खासदार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी सर्व खासदार मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्याचेही समजते. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्ली दौऱ्यावर आहेत.
दोन तृतीयांश फूट प्रत्यक्षात यावी यासाठी शिवसेना उबाठाचे नऊ खासदार निवडून आल्याने सहा खासदारांची गरज होती. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे खंदे पाठीराखे असलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजू बदलल्याने आकड्यांचे गणित पूर्ण झाले.
संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांचा बंडखोरांमध्ये समावेश.