पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यास गटाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याने आता अपघात होत नाहीत, असा दावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केला होता. परंतु, त्यांचा हा दावा शनिवारी झालेल्या अपघातामुळे फोल ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर फेब—ुवारी 2022 मध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय), प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे महापालिका, वाहतूक पोलिस अशा यंत्रणांची बैठक घेतली होती. त्यात अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी 'सेव्ह लाइफ फाउंडेशन' या खासगी संस्थेला काम देण्यात आले होते.
'सेव्ह लाइफ फाउंडेशन'ने काही दिवस अपघातस्थळांचा अभ्यास करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यात सुरक्षा अडथळे उभारणी, संबंधित भागात वेगमर्यादेसह जनजागृतीचे फलक लावणे, क्रॅश बॅरिअर लावणे, महामार्गावर वेगाला मर्यादा येण्यासाठी रम्बल स्ट्रिप करणे, अतिक्रमणे काढणे, स्पीडगन लावणे, अशा विविध उपाययोजना कात्रज बोगदा ते नवले पूल यादरम्यान राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची संपूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अपघात झाले नाहीत, त्यामुळे उपाययोजनांचा परिणाम असल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केला होता.
नितीन गडकरी यांचेही होते लक्ष
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांकडे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचेही लक्ष होते. गडकरी यांनी जिल्हा प्रशासनाची ऑनलाइन बैठक घेऊन उपाययोजना करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. उपाययोजनांसाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्या उपाययोजनाही फोल ठरल्या आहेत.