पुणे : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. ठाकरे गट मातोश्रीएवढाच मर्यादित आहे. तो महाराष्ट्र आणि भारत नाही. काय राहिले आहे? आता ठाकरे संपले, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राणे पुण्यात आले होते. या सांत्वनभेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना राणे म्हणाले की, पुण्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही तुम्ही मला ठाकरे गटाबद्दल का प्रश्न विचारता?
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारावर विचारलेल्या प्रश्नावर 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रकरण सांभाळतील' असे म्हणत त्यांनी जास्तीचे बोलणे टाळले. राणे यांनी बापट यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. बापट 1995 साली आमदार म्हणून सभागृहात आले तेव्हा मी स्वतः आमदार होतो. विधिमंडळाच्या कामात ते रस घायचे असे त्यांनी सांगितले. सोमय्या यांनीही केले सांत्वन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी बापट यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. या वेळी त्यांनी बापट यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश बापट हाडाचे कार्यकर्ते होते. नवीन पिढीला त्यांच्याकडून खूप शिकायचे आहे, असे ते म्हणाले.