भवानीनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : निरा डावा कालव्याला रायतेमळा (सणसर, ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि. 7) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा भगदाड पडले. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. या भागातील शेतकर्यांच्या घरामध्ये तसेच पिकामध्ये पाणी शिरून नुकसान झाले. निरा डावा कालव्याला एकाच महिन्यात एकाच ठिकाणी दुसर्यांदा भगदाड पडले.
कालव्याला 13 मार्च रोजी रायतेमळा येथे याच ठिकाणी भगदाड पडून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता शुक्रवारी पुन्हा याच ठिकाणी कालव्याला भगदाड पडले. 13 मार्च रोजी भगदाड पडल्यानंतर मोरीचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. परंतु, काँक्रिटीकरणानंतर त्वरित कालव्याला आवर्तन सोडल्याने पुन्हा भगदाड पडले असावे, असा शेतकर्यांचा अंदाज आहे.
कालव्याच्या मोरीला भगदाड पडल्यानंतर कालव्यातील पाणी मोरीमधून येथील वितरिकेच्या पाटांमध्ये शिरले व त्यातून ते परिसरातील शेतकर्यांच्या घरांमध्ये तसेच शेतामध्ये शिरले. रायतेमळा, निवसेवस्ती, निंबाळकरवस्ती, या भागांतील शेतकर्यांना या अतिरिक्त पाण्याचा फटका बसला. यामुळे पुन्हा पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले. 13 मार्च रोजी शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नसताना आता पुन्हा नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.